Sachin Salve | Updated On: Jul 7, 2017 06:30 PM IST
महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक,IBNलोकमत
साईबाबांना हवाय ब्रँड अॅम्बेसेडर, हे वाचून आपल्याला कसतरीच वाटतंय ना ? होय मला पण. शिर्डीच्या साईबाबा संस्थानानं ब्रँड अॅम्बेसेडर नेमण्याची तयारी सुरु केलीय. या बातमीने आजची सकाळ उगवली. साईबाबा, जे स्वतः प्रेमाचे, त्यागाचे, आध्यात्मिक ज्ञानाचे, सामाजिक सौख्याचे आणि धार्मिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखले जातात त्यांच्या समाधीस्थ होण्यास पुढच्या वर्षी शंभर वर्षे पुर्ण होत आहेत. त्यासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सिनेस्टार किंवा क्रिकेटपटू यांची नेमणूक करून साईबाबांना अधिक 'प्रसिद्धी' मिळवण्याचा घाट घातला जातोय. खुद्द शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी ही माहिती दिली आहे.
येत्या 15 आॅक्टोबरपासून साई संस्थान आणि ग्रामस्थ मिळून साई समाधी शताब्दी सोहळ्यास सुरवात करणार आहेत. त्यापूर्वी गुजरातच्या पर्यटन वाढीसाठी, महाराष्ट्र वनविभागाच्या वाघ संवर्धनासाठी ब्रँड अॅम्बेसेडर होणाऱ्या अमिताभ बच्चन किंवा अनेक जाहिरातीत झळकणार्या क्रिकेटपटू 'भारतरत्न' सचिन तेंडुलकर आणि सध्या गाजणार "बाहुबली" प्रभास यांना ब्रँड अॅम्बेसेडर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे सारे अनाकलनीय आहे.
धर्मकारण, अर्थकारण आणि राजकारण यांची नेहमीच एकमेकांत सरमिसळ झालेली दिसते. म्हणूनच असेल कदाचित, ज्यांनी आयुष्यभर फकिरीत आनंद मानला त्या साईबाबांना भक्तमंडळी सोन्याच्या आभूषणांनी मढवतात. पुट्टपुर्थीचे सत्यसाईबाबा मृत्यूनंतर कोट्यवधी रुपये मागे सोडून जातात. वर्षानुवर्षे बंद असलेल्या दक्षिणेतील पद्मनाभ मंदिरातील तळघरात अगणित संपत्तीचा साठा मिळतो. तिरुपती किंवा सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटय़ांमध्ये लाखो रुपये जमा होतात आणि या साऱ्या पैशाभोवती धर्मकारण आणि राजकारण भिरभिर फिरते. या दुष्टचक्रात सर्वसामान्य मात्र भरडून निघतो. धनाढय़ भक्त साजूक तुपातील चविष्ट पदार्थाची देवाच्या मूर्तीसमोर रोज आरास करतात, पण आपल्या अवतीभोवती पसरलेल्या दरिद्री बांधवांची भूक भागवणे त्यांना गरजेचे वाटत नाही. देवाला उंची वस्त्रे-आभूषणे, पण आमच्या लाखो गोरगरीब आया-बहिणींना लज्जारक्षणार्थ चांगले कपडे मिळत नाहीत. देवासाठी पायी चालणारे, तासन् तास रांगा लावणारे लोकशाहीतील मतदानाचे परमकर्तव्य बजावताना दिसत नाहीत. देशातील राजकारण्यांवर टीका करण्यासाठी हाच वर्ग पुढे असतो. जोवर हे असे दांभिक प्रकार थांबणार नाहीत, तोवर शिर्डीच्या साईबाबा संस्थानात, प्रत्येक देवळात अनागोंदी कारभार होत राहणार.
दोन-तीन वर्षांपूर्वी शिर्डीचे श्रीसाईबाबा हे देव नाहीत, म्हणून हिंदूंनी त्यांची पूजा करू नये, असे भन्नाट विधान करून द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. तसे पाहायला गेल्यास हे स्वरूपानंद महाराज अशा वादग्रस्त विधानांसाठी आणि कृतीसाठी बऱ्यापैकी चर्चेत असतात. मध्यंतरी एका पत्रकारावर हल्ला करून ते चांगलेच चर्चेत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवत्व देणाऱ्या ‘हर हर मोदी’ या घोषणेविरोधातही या शंकराचार्यानी उघड नाराजी व्यक्त केल्याने भाजपातील धर्ममरतडांची बरीच अडचण झाली होती. त्यांनी शिर्डीचे साईबाबा यांच्यावर कारण नसताना आगपाखड केल्याने एका नवीन वादाला तोंड फुटले होते.
हिंदू धर्म संसदेने तर त्यापुढे जाऊन ‘‘१९व्या शतकातील साईबाबा हे देव तर नाहीत, पण संत किंवा गुरूही नाहीत. त्यांची देवता म्हणून पूजा करता येणार नाही,’’ असा थेट निर्णयच घेतल्याने दोन वर्षांपूर्वी गोंधळच उडाला होता.
धर्म संसदेचे प्रसिद्ध प्रमुख राजेश जोशी यांनी साईबाबांची यापुढे देवता म्हणून उपासना करू नये, असे घोषित केले. या बैठकीला १३ आखाडय़ांचे प्रतिनिधी आणि अन्य धार्मिक नेते उपस्थित होते. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शिर्डीच्या ‘श्री साईबाबा संस्थान’लाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. तरीही साईबाबांची बाजू मांडण्यासाठी दिल्ली आणि अहमदाबाद येथील साईबाबांचे काही भक्त या बैठकीला उपस्थित होते. साईभक्त आणि आखाडय़ातील साधू यांच्यात चर्चा होण्याआधीच जोरदार वाद झाला. आखाडाप्रमुखांनी साईभक्तांना चक्क व्यासपीठावरून हाकलून दिले आणि चर्चा करून साईबाबा हे देव नसल्याचा ठराव मंजूर केला होता, हा इतिहास अगदी ताजा आहे.
धर्मसंसद असो वा स्वामी स्वरूपानंद आणि त्यांच्यासारख्या अनेक हिंदुत्ववादी धर्ममार्तंडाना शिर्डीतील साई मंदिरात दररोज वाढणारी गर्दी नेहमीच डोळ्यांत खुपत असते. साईबाबांसमोर पडणारा सोन्या-नाण्याचा आणि करोडो रुपयांचा खच या धर्ममार्तंडांची पोटदुखी वाढवत असतो, त्यामुळे साईबाबांचे मुस्लीम असणे, ही एकच गोष्ट पुढे करून हे लोक त्यांच्या विरोधात बोलत असतात. खरं सांगायचं तर शंकराचार्य व अन्य कोणत्याही धर्मगुरूंना साईबाबा किंवा तत्सम विषयावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांना जर समाजप्रबोधनच करायचे असेल, तर आपल्याकडे विषयांची कमतरता नाही. वाढत्या अंधश्रद्धेविरोधात, कर्मकांडांच्या वाढत्या अवडंबराविरोधात किंवा घातक रूढी-परंपराविरोधात ते सहजपणे बोलू शकतात. दुर्दैवाने तसे काम करण्याऐवजी आमच्याकडील बोलभांड धर्मगुरूंना भ्रामक आणि भंपक गोष्टींमध्ये जास्त रस असल्याचे दिसून येते. साईबाबांनी त्यांच्या हयातीत नेहमीच धर्मातील भंपकबाजींची चिकित्सा केली होती. सामान्य लोकांनी "श्रद्धा आणि सबुरी " या दोन गोष्टी केल्या तर जगणे सोपे होते.
"सबका मलिक एक है " या सर्व धर्म समभाव सांगणाऱ्या तत्वाचा स्वीकार केला की मनातील द्वैत नष्ट होते. असं साईबाबा सांगायचे. त्यांच्या या सहजसोप्या शब्दांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील साधक - मुमुक्षू शिर्डीकडे आकर्षित झाले होते. आजही साईबाबांच्या दर्शनाला लाखो लोक येतात, त्यामुळे शिर्डी सारख्या छोट्या गावाचे एका मोठ्या धार्मिक ठिकाणांमध्ये रूपांतर झाले आहे. जे स्थान शंभर वर्शांपूर्वी पंढरपूचे होते, ते आता शिर्डीचे आहे, म्हणून तेथील प्रत्येक घडामोडीकडे अवघ्या महाराष्ट्र्राचे नव्हे देशाचे लक्ष लागलेलं असते. या ब्रँड अॅम्बेसेडर च्या नव्या 'फॅड'मुळे शिर्डी संस्थान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

साधारणत: १८५८ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या आडवळणाच्या छोट्याशा गावात साईबाबांचे आगमन झाले. एका लग्नाच्या वऱ्हाडासोबत शिर्डीत आलेल्या सोळा- अठरा वर्षाच्या तरुणाला खंडोबा मंदिरातील पुजारी म्हाळसापती यांनी ‘‘आओ साई’’ अशी साद घालून बोलावले, तेव्हापासून साईबाबा हे नाव शिर्डीच्या नावाशी एकरूप झाले.
सुफी संप्रदायामध्ये पीर, फकिरांना साई नावाने संबोधण्याची परंपरा आहे. पण साईंच्या संपर्कात आलेल्या बहुतांश हिंदू भक्तांनी ‘साई’ या शब्दाची फोड ‘साक्षात ईश्वर’ अशी केली असावी, त्यामुळे साईतत्त्व ज्ञानाचा महिमा साधारणत: दीडशे वर्षापासून देशात आणि देशाबाहेर पसरताना दिसतोय. साईबाबांनी आपल्या संपूर्ण हयातीत निधर्मी एकेश्वरवादाचा सातत्याने पुरस्कार केला. त्यांच्या भक्तगणांमध्ये हिंदू-मुस्लिमांसह, पारशी आणि ख्रिश्चनांचादेखील भरणा असे. प्रत्येक धर्मीयाला त्याच्या धर्मानुसार वर्तन करायला सांगताना, ते ‘सबका मालिक एक है’ ही बाब आवर्जून सांगत.
आपल्या जीवनामध्ये यशस्वी वाटचाल करण्यासाठी ‘श्रद्धा आणि सबुरी’ या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, असे साईबाबांचे सांगणे असायचे. त्यांच्या या विचारांना माणुसकीची जोड होती. ते स्वत: आजारी माणसांना बरं करण्यासाठी झटायचे. आपल्याकडे आलेल्या लोकांना स्वत:च्या हाताने जेवण करून द्यायचे आणि सगळ्यांनी मानवतेला धरून वागावं, असा सहजसोपा माणुसकीचा धर्म सांगायचे. म्हणून आजही जगभरातल्या लोकांना साईबाबा आपले वाटत असावेत. त्याउलट कर्मठ हिंदू रूढी-परंपरा दिवसेंदिवस कालबाह्य ठरताना दिसताहेत. लोकांच्या आचार-विचारावर पाश्चात्त्य जीवनशैलीचा प्रभाव वाढतोय. हे सगळं थांबवायचं सोडून जर शिर्डीच्या 'मार्केटिंगचाच' विचार होणार असेल तर त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रचार कोण करणार ?
वास्तविक पाहता शिर्डीतील सद्य:स्थिती हा खरा सामूहिक चिंतेचा विषय असला पाहिजे. देशात तिरुपतीच्या बरोबर सर्वाधिक आर्थिक कमाई असणारे शिर्डी ‘संस्थान’ हे कधी तरी, कुणी तरी खालसा करण्याची आवश्यकता आहे. विविध राजकीय पक्षांनी लोकांच्या देणग्यांतून जमा होणा-या निधीवर आपले ‘पहारेकरी’ बसवण्याची परंपरा निर्माण केल्यामुळे देवाच्या चरणी वाहिलेला पैसा क्वचितच कारणी लागताना दिसला. आज जर तुम्ही शिर्डीत गेलात, तर तिथे तुम्हाला प्रचंड विरोधाभासच दिसेल. ज्या शिर्डी संस्थानाचे १९२२ साली वार्षिक उत्पन्न अवघे २०० रुपये होते, त्या शिर्डी संस्थानाचे फक्त पाच-सहा वर्षातील उत्पन्न पाहिले तर आपले डोळे फिरतील. श्रद्धेने शिर्डीत येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
शनिवार-रविवारी दर्शनार्थीची संख्या एक लाखाहून अधिक असते. आणि सुट्टीच्या दिवसांत तर शिर्डी लाखो लोकांनी गजबजून गेलेले दिसते, पण तरीही या शहराच्या एकूण व्यवस्थेकडे कोणाचेच लक्ष नाही. दिवसेंदिवस शिर्डी बकाल आणि भकास होत चालली आहे. नगरविकासाच्या सा-या संकल्पना पायदळी तुडवल्या असल्यामुळे तेथील पायाभूत सुविधा पूर्ण कोलमडून गेलेल्या दिसतात. रस्ते जवळजवळ नसल्यासारखेच आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृह किंवा शौचालयांची सर्वत्र दुरवस्था झालेली आहे. जगातील सगळ्या अनैतिक गोष्टींचा बाजार शिर्डीच्या रस्त्या-रस्त्यांवर मांडलेला असतो. दानपेटीवर नजर ठेवून बसलेल्या संस्थानाधिपतींना मात्र या मंदिराबाहेरील दुरवस्थेची चिंता नसते. ते सारे मग्न आहेत व्यावसायिकरणाच्या एककलमी कार्यक्रमात. जेवढे जास्त उत्पन्न मंदिराला मिळणार तेवढी पैसे खाण्याची संधी जास्त, अशा या विश्वस्त मंडळींचा विचार असेल, त्यामुळे लोकांना भुलवण्याच्या आणि पैसे कमावण्याच्या नवनवीन शक्कल लढवल्या जातात.
मध्यंतरी विश्वस्त मंडळाने साईबाबांसाठी बावीस कोटी रुपये खर्चून सोन्याचे सिंहासन तयार करण्याची घोषणा केली होती, त्या विरोधात सर्वसामान्य माणसांनी आवाज उठवल्यामुळे तो मुद्दा मागे पडला होता. त्यानंतर विश्वस्त मंडळाने रॉयल्टीचा एक नवाच वाद निर्माण केला होता. साईबाबा हे एक ‘प्रॉडक्ट’ आहे. त्याची मालकी आणि त्यांच्या मार्केटिंगचा अधिकार फक्त आमच्याकडे आहे, असे समजणाऱ्या विश्वस्तांनी देशातील सुमारे दोन हजार आणि विदेशातील सुमारे दीडशे मंदिरांनी त्यांच्या दानपेटीत जमा होणाऱ्या रकमेपैकी २५ टक्के रक्कम शिर्डी संस्थानाला द्यावी, अशी विचित्र मागणी केली गेली होती, पण त्यावरही टीकेची झोड उठल्यामुळे विश्वस्तांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला. एकूणच काय तर खोटी प्रवास बिले सादर करण्यापासून तर शिर्डीतील विमानतळाला आर्थिक निधी देण्याच्या मुद्दयापर्यंत अनेक विषयांत शिर्डी संस्थानाचे ‘संस्थानिक’ वादग्रस्त ठरले होते. त्यांना सुधारण्याचे न्यायालयाचे प्रयत्नसुद्धा अयशस्वी ठरलेले दिसतात आणि म्हणूनच लोकांच्या पैशावर चालणाऱ्या या साऱ्या मठ-मंदिरांतील कोटय़वधी रुपये समाजातील दुर्बल आणि उपेक्षित घटकांसाठी वापरले जावेत यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे.
शिर्डी ज्या नगर जिल्ह्यात आहे, तेथील दुष्काळग्रस्त आदिवासी तालुके जरी डोळयासमोर आणले तरी आपल्याला साईबाबांचे नाव घेऊन पैसे जमवणाऱ्या, या धंदेवाईक लोकांची स्वार्थी वृत्ती लक्षात येईल. ज्या साईबाबांनी आयुष्यभर फकिरी बाणा अंगीकारला होता, ज्यांचे दररोजचे जेवण भिक्षा मागून होत असे, त्या साईबाबांच्या मूर्तीसमोर आता चांदीच्या ताटात पंचपक्वान्नांचा नैवेद्य ठेवला जातो. पण लगतच्या गावांमधील गोरगरिबांच्या खपाटीला गेलेल्या पोटांमध्ये दोन-चार दाणे पडावेत, यासाठी मात्र कुणीच प्रयत्न करताना दिसत नाही. नगर जिल्हा हा पाणीटंचाईसाठी ओळखला जातो. विशेषत: ग्रामीण भागांतील महिलांना पाण्यासाठी मैलोन् मैल भ्रमंती करावी लागते. ते थांबवण्यासाठी आजवर शिर्डी संस्थानाने ठोस पाऊल उचललेले दिसत नाही. मग जर विश्वस्तांनाच साईबाबांच्या विचारांचा विसर पडला असेल, तर शिर्डीतील काळे धंदे करणाऱ्या लोकांना दोष देण्यात काही अर्थ नाही. आज साईबाबांनी सांगितलेली भूतदया सगळ्यांनी अंगीकारण्याची गरज आहे. आमच्या सर्वच संतांनी गरिबांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे सांगितले.
साईबाबाही आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला तसाच उपदेश करीत. वारकरी संप्रदायाच्या मानवतावादी मुशीत घडलेल्या महाराष्ट्राला म्हणूनच साईबाबांचे हे विचार पटले असावेत. महाराष्ट्राने पंढरीच्या पांडुरंगाएवढाच विश्वास साईबाबांवर दाखवला. परिणामी शिर्डीसारख्या खेडयात अवतरलेला एक फकीर अल्पावधीत कोटय़वधी मराठी घरांत आसनस्थ झाला. आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत कोणते, तर पांडुरंगाबरोबर साईबाबांचेही नाव घ्यावे लागेल. साईबाबांचे चरित्र लिहिणाऱ्या प्रख्यात संतकवी दासगणू यांनी एका अभंगात शिर्डीची तुलना पंढरपूरशी केलेली दिसते. ते म्हणतात –
शिर्डी माझे पंढरपूर, साईबाबा रमावर।
शुद्धभक्ती चंद्रभागा, भाव पुंडलिक जागा।।
पण काळानुरूप बदललेल्या शिर्डीतील सध्याची स्थिती आता वेगळी आहे. येथे पुंडलिकाचा भाव असलेला भक्त येताना दिसत नाही आणि बाजारूपणाच्या भाऊगर्दीत शिर्डीतील शुद्ध भक्तीची गंगा साफ आटून गेलेली दिसते. ती पुन्हा भावभक्तीने आणि माणुसकीच्या शक्तीने खळाळून वाहती व्हावी. तिच्या साहाय्याने शिर्डीच्या आसपासच्या तालुक्यांतील लोकांचे जगणे जरी सुजलाम-सुफलाम झाले तरी साईबाबांच्या विचारसरणीचा विजय झाला, असे म्हणता येईल.
link - http://www.ibnlokmat.tv/editorial-opinion/mahesh-mhatre-blog-on-shirdi-sai-baba-want-brand-ambassador-264544.htm
l
l
No comments:
Post a Comment