Flash

Tuesday, 31 October 2017

अमृता-इमरोझ एक प्रेमकहाणी

ब्लॉग स्पेस

अमृता-इमरोझ एक प्रेमकहाणी
 Mar 23, 2009
अमृता-इमरोझ एक प्रेमकहाणी
Posted by सोनाली देशपांडे | {5} कॉमेन्ट्स
अमृता प्रीतम आपलं आयुष्य एखाद्या कवितेप्रमाणे जगल्या.. त्यांचं आयुष्य फुलपंखी नक्कीच नव्हतं. शारीरिक-मानसिक दु:खही भरपूर होती. पण इमरोझ आणि अमृता यांची साथ सगळ्या संकटांना सामना करू शकेल इतकी भक्कम होती.

अमृता-इमरोझ अ लव्ह स्टोरी या उमा त्रिलोक यांच्या इंग्लिश पुस्तकाचं भाषांतर अनुराधा पुनर्वसू यांनी केलं अमृता-इमरोझ एक प्रेम कहाणी या नावानं.. या पुस्तकात आपल्याला फक्त अमृता-प्रीतम किंवा इमरोझ भेटत नाहीत.. तर सापडतो एक सच्चेपणा आणि दुर्मिळ अशी प्रेमभावना..जी शारिरी प्रेमाच्याही पलीकडे जाते..

चाळीशीत अमृता प्रीतमना इमरोझ भेटले. अमृता प्रीतम आणि इमरोझ यांचा सहवास 40 वर्षांचा..तेही कुठल्याच कायदेशीर नात्याचा अट्टहास न करता. फक्त प्रेमाच्या नात्यावर त्यांचा संसार झाला. 60-65 वर्षांपूर्वीची ही गोष्ट म्हणजे एक क्रांतीच होती.. उमा त्रिलोक अमृताजींना भेटल्या तेव्हा अमृताजी थकल्या होत्या. आजारी होत्या. आणि त्याच काळातलं इमरोझ-अमृता यांचं नातं लेखिकेनं अनुभवलं आणि शब्दबद्ध केलं.

अमृता-इमरोझच्या आयुष्यातले एकेक किस्से लेखिका गुंफत जाते. अधेमधे त्यावर भाष्यही करते. ओघवत्या भाषाशैलीमुळे वाचकाच्या समोर ते प्रसंगच उभे राहतात.

दोन मुलांची आई आणि विवाहित असलेल्या असलेल्या अमृताजींचा इमरोझबरोबर राहण्याचा निर्णय म्हणजे खूप मोठं बंडच होतं. त्यावर लेखिका म्हणते, 'बदल पाहिजे बदल पाहिजे अशा गप्पा आपण मारतो. पण प्रत्यक्षात बदल घडून येतो, तेव्हा मात्र घाबरतो. अमृता-इमरोझनं स्त्री-पुरुष संबंधाबद्दलची नवी वेगळी भाषा दिली आहे.'

अमृता प्रीतमची बंडखोरी आपल्याला अनेक ठिकाणी दिसते. एक किस्सा असा आहे की दोघं मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येत होते. ट्रेनमध्ये सामानात काही दारू वा मादक पदार्थ आहेत का हे तपासायला पोलीस आले. अमृता प्रीतम म्हणतात - 'आमच्यापाशी तसं काही नाही, याची खात्री करून घेऊन त्यांनी आम्हाला सोडून दिलं. पण एकमेकांबरोबर असण्याची नशा आम्हाला पुरेशी आहे, हे त्यांना माहीत नव्हतं. आमची नशा ते थोडीच उतरवू शकणार होते.'

अमृता-इमरोझ एक परिकथा वाटली, तरी तिला वास्तवाची झालर आहे. म्हणूनच अमृताजींचं साहिर सुधियानींवर असलेल्या प्रेमाचाही उल्लेख येतोच आणि त्याचा स्वीकार इमरोझनी केलाच होता. अमृताजी इमरोझपेक्षा वयानं मोठ्या. त्यांच्या आजारपणात इमरोझनी त्यांची खूप सेवा केली. इमरोझ हे मोठे चित्रकार होते.. पण अमृताजींपुढे ते तसे झाकोळलेले राहिले. त्यावर ते स्वत: म्हणतात, 'लोक म्हणतात की तुमचं आयुष्य तुम्ही केवळ अमृताला वारा घालण्यातच व्यतीत केलं. पण त्यांना हे माहीत नाही की तिला वारा घालता घालता मलाही हवा लागत होती.'

लेखिकेनं नात्याचे इतके पैलू मांडलेत की वाचताना थक्क व्हायला होतं.. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी अमृता किंवा इमरोझला महान बनवलं नाही. की स्वत:चा उदोउदोही केला नाही. ही माणसांची गोष्ट आहे. त्यांच्या गुणदोषांसकट.. पण ही माणसंच अनोखी आहेत.एके ठिकाणी इमरोझ म्हणतात, अमृताची भेट झाल्यापासून माझ्यातली रागाची भावना लुप्त झाली. प्रेमाची भावना प्रबळ झाल्यामुळे द्वेष, राग, मत्सर यांना थाराच नसावा. प्रकाश असेल तिथे अंधार असेल का?

पुस्तकात अमृताजींच्या पंजाबी कवितांचंही भाषांतर आहे. ते फारच नैसर्गिक वाटतं. आपल्या आजूबाजूला मनाच्या आणि रक्ताच्या नात्यांतली असुया, कडवटपणा आपण पाहत असतो. अनुभवत असतो. अनेक जण मी माझं मला या वर्तुळात फिरत असतात. या सर्व परिस्थितीत हे पुस्तक हाती पडतं आणि ते वाचल्यावर आनंदाची लहर आपल्या मनात बराच काळ तरंगत राहते..

सोनाली देशपांडे

link - http://im.ibnlokmat.tv/showblog.php?id=57212

No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...