Flash

Tuesday, 1 August 2017

*शाहूचरित्र...काय शिकवते ?? ( भाग १ )*
आपल्या देशातील नव्हे तर जगातील कोणत्याही प्रशासकाला आपल्या जनतेशी कसे वागावे याचा वस्तुपाठ म्हणून कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांच्या राज्यकारभाराकडे पाहावे लागेल. अत्यंत छोट्या संस्थानात राहूनही अत्यंत मोठया कामांना लीलया हात घालून ते पूर्णत्वास कसे न्यायचे , त्या कामात जनतेचा कसा सहभाग करून घ्यायचा , आपल्या प्रशासनाला कसे कृतिशील करायचे आणि एक आदर्श व्यवहार वास्तवात कसा उतरवायचा याचे अनोखे दर्शन लोकराजा शाहूराजाच्या चरित्रात पावलोपावली दिसून येते.
*लोकराजा शाहूंच्या जीवनातील एक गोष्ट प्रख्यात आहे.१९०२ साली शाहूराजांनी एका अनोख्या क्रांतीस जन्म घातला. संस्थानातील उपलब्ध जागांपैकी ५०% जागा ह्या मागासवर्गीय समाजाकरता राखून ठेवण्याचा निर्णय झाला. 'आरक्षण' ह्या धोरणाची कृतिशील सुरुवात होती ही. याला समर्थन मिळाले तसाच विरोधही होऊ लागला. अभ्यंकर नावाचे गृहस्थ शाहूराजाकडे आले आणि त्यांनी या आरक्षण धोरणा विरोधात आपली तक्रार सांगितली. तेंव्हा शाहूराजांनी त्यांना घोड्यांच्या तबेल्यात नेले. घोड्यासमोर खाद्य पसरले. धडधाकट व तंदुरुस्त घोड्यांनी पुढे येऊन सारे खाद्य संपवले न् काही दुबळी घोडी ते खाद्य मिळवण्यात अपयशी ठरली. तेंव्हा हे दृश्य अभ्यंकराना दाखवून काही खाद्य मुठीत घेऊन दुबळ्या घोड्यांना शाहूराजांनी चारले. अभ्यंकराना " आरक्षण नीतीचे मर्म " समजले.
ही गोष्ट आठवण्याचे कारण हे की या गोष्टीचे मर्म आमच्या शासनकर्त्यांना कधी कळणार ? ....हा पडलेला प्रश्न. उदाहरणच बघूया...सध्या शेतकरी कर्जमंजुरीचा विषय बराच गाजतोय. शेतकरी संपावर जाण्याचा प्रकार घडला. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून शेतकरी संघटना व त्यांचे नेते , बरोबरीला विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले. यातून काही चर्चा घडून कर्जमाफी घोषित झाली. मला इथे सांगायचय की...शासनस्तरावर एकही मंत्री अथवा आमदार , कृषीखात्यातील अधिकारी यांनी पुढे येऊन तमाम आंदोलकांना , शेतकऱ्यांना , राजकीय विरोधकांना प्रत्यक्षात बांधावर नेऊन " फायद्याच्या शेतीचे गणित " समजावून सांगू शकत नाहीत असे का ?? कर्जमाफी हा वरवरचा उपाय आहे असे शासन सांगते व मलाही ते मान्य आहे . तर मग शेतीला लागणाऱ्या पुरक उद्योगाची माहिती , शेतीत करावी लागणारी आधुनिक तंत्रज्ञानाची गुंतवणूक , हवामानानुसार घ्यायची पिके , जागतिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी मिळवायची संधी , उत्पादनाच्या खर्चावर कमीत कमी खर्च कसा करता येईल याचे गणित मांडून का नाही दाखवले गेले ?? ....याचे कारणच मूळात आजचे शासन हे शाहू विचारांचा वारसा सांगत नाही. राजाला असावी लागणारी दूरदृष्टी आजकालच्या ( गेल्या ५० वर्षातील शासनकर्ते ) सरकारजवळ नाहीय. त्यामुळं विरोधी मत घेऊन आलेल्या अभ्यंकराना जसे शाहूराजाने प्रत्यक्ष उदाहरण समोर दाखवले तसे आमचे राज्यकर्ते दाखवू शकत नाहीत. परिणाम....जनता व शासन दरी नेहमीच रुंदावत राहिलीय. याचा विचार होणार की नाही ??*
शासनकर्ता ..मग तो कुणीही असो , त्याला जनता व विरोधक यांच्या बरोबर संवाद साधण्याची हातोटी व कौशल्य असावे लागते. ते असेल तर कोणत्याही निर्णयाकरता पळवाटा शोधल्या जात नाहीत व घेतल्या जाणाऱ्या निर्णयावर " बिनडोकी कष्ट " घ्यावे लागत नाही. शाहूचरित्र ...हेच शिकवते.
*!! शासनकर्ता..अभ्यासू , निश्चयी , दूरदृष्टीचा असावा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५

*शाहूचरित्र ...काय शिकवते ? ( भाग २ )*
शाहूराजाची एक गोष्ट मला नेहमीच त्यांच्या विषयी आदरभाव उत्पन्न करते. शाहूराजाने राज्यकर्ता असूनही आपल्या जनतेतीला सामान्य माणसापासून अनेक बुध्दीवंत माणसांना योग्य प्रकारे " जपले " व त्यांना सतत प्रोत्साहीत केले. हा रयतेचा राजा जसा सामान्य माणसाच्या गाठोड्यातील भाकरी हक्काने खात होता तसेच तो बुध्दीवंत माणसांनाही हृदयाजवळ जपत होता. अनेक मोठे बुध्दीवंत शाहूराजाजवळ वर्षानुवर्षे राहिले त्याचे हे एक कारण होते. एक गोष्ट ऐकवतो....
*भाई माधवराव बागल...हे नाव महाराष्ट्रात सर्वपरिचीत आहे. भाईंच्या लग्नावेळी घडलेली ही गोष्ट. भाईंचे वडील खंडेराव बागल हे कोल्हापूर संस्थानातील नामी व्यक्तीमत्व . आपल्या मुलाचे अर्थात भाईजींच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला शाहूराजाकडे गेले. आमंत्रण मिळताच शाहूराजानी त्यादिवशी काही कामानिमित्त यायला जमणार नाही लग्नाला असे सांगून टाकले. खंडेराव थोडे नाराज झाले. त्यावेळी लग्नखर्चातील एक सन्माननीय खर्च म्हणून शाहूराजांना आहेर करण्यासाठी ५०० रुपयाचि रक्कम खंडेरावानी अलग बाजूला ठेवली होती. शाहूराजानी लग्नाला यायला नकार देताच खंडेराव नाराज झाले खरे पण त्यांना ती ५०० रुपयाची रक्कम इतरत्र वापरता आली. शाहूराजा येणार नसल्याने खंडेराव निश्चिंत होऊन आपल्या लगीनघाईत रमून गेले. लग्नाचा दिवस उजाडला. लग्नाची वेळ झाली. अचानकच शाहूराजा मंडपजवळ हजर झाले. महाराज अचानकच लग्नाला आल्याने खंडेराव थोडे गोंधळले . कारण महाराजांच्या आहेराचा खर्च त्यांनी इतरत्र केला होता. महाराज हसतहसत लग्नाला आले व आपल्या कडून बागल दांपत्याला " आहेर " देऊन गेले. .....ही गोष्ट काय सांगते ? शाहूराजाचे हृदय ज्यांना ठाऊक आहे त्यांना यातील मर्म अचूक कळते. आपण लग्नाला येणार म्हटल तर खंडेराव आपल्याला आहेर करणार व त्याचा बोजा त्यांच्या वर पडणार हे त्यांना ठाऊक होते. म्हणून जाणीवपूर्वक सुरुवातीला नकार दिला व अचानक लग्नाला हजेरी लावून बागलांनाच आहेर करून त्यांना खूश करून टाकले. आजकाल आपण पाहतो की , सध्या काही नेत्यांच्या नावे सामान्य कार्यकर्ते लग्नपत्रीका काढतात. " अमुक अमुक साहेबांचा शुभाशिर्वाद " असे ठळकपणे छापले जाते. तो नेता लग्नाला येणार म्हणून लगीनघरातील एक यंत्रणा कामाला लागलेली असते. नेत्याचा व बरोबरीने येणाऱ्या त्याच्या कार्यकर्त्यांना यथोचित सन्मान करणे हे एक " परमपवित्र कर्तव्य " होऊन बसते. नेता येतो ( नेहमीप्रमाणे वेळानेच ) येताना दहाजण बरोबर घेऊन येतो , लगीनठिकाणी बडेजाव मिरवतो , फोटोसेशन करतो , हाय - हँलो करत हात हलवत बाय बाय करून जातो. न देणं न घेणं असा हा विचित्र व्यवहार असतो. आपण काय बोलावे ? कारण इथे ना कुणी शाहूराजा असतो ना कुणी खंडेराव बागल..*
आपल्या कार्यकर्त्यांची नेमकी स्थिती काय आहे...तो कोणत्या संभ्रमात अथवा अडचणीत आहे..त्याला किमान आपल्या मुळे कोणत्याही त्रासाला तोंड द्यावे लागणार नाही ...ही काळजी नेत्याला असायला हवी. तर न् तरच नेत्याविषयी निष्ठा व विश्वास कायमस्वरुपी निर्माण होतो. शाहूचरित्र हेच तर शिकवते...
*!! जपावे माणसांना कळवळीने , तरच जपले जाते नाते कायमचे !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५

*शाहूचरित्र ....काय शिकवते ? ( भाग ३ )*
सामान्य जनता व राज्यकर्ते यांच्यातील कोणत्याही प्रकारचे अंतर खरे तर असू नये. हूशार व प्रजेची काळजी वाहणारा नेता हा नेहमीच लोकांच्यात वावरतो. बेधडक मिसळतो. सामान्य माणसाला तो कायमचा उपलब्ध असतो. या कारणाने नेता व सामान्य जनता यांच्या मध्ये विश्वासाची एक नाळं तयार होते. लोक आपल्या नेत्याला थेट भेटू शकतात. तै नेता कितीही मोठा होवो पण..पण तो माणूस म्हणून आजही आपल्यातलाच आहे ही विश्वासार्हता निर्माण होते ते अशाच प्रकारे. शाहूराजाने आयुष्यभर अशी विश्वासार्हता मिळवली , टिकवली व उत्तरोत्तर ती वाढतच गेली. एक नजर या उदाहरणावर टाकुया...
*शाहूराजा...हा सोनतळी या आपल्या ठिकाणाहून निघताना व इतरही बरेचदा " खडखडा " नावाच वाहन वापरत. खडखडा म्हणजे ज्याच्या चाकांचा आवाज खाडखाड निघतो असे वाहन. या वाहनाला पुढे आठ घोडी जुंपलेली असत. फारच लांबीला असणारा हा खडाखडा म्हणजे शाहूराजाच्या आगमनाची वर्दी असायची. सामान्य लोक या वाटेवर महाराजांची वाट बघत थांबायची. शाहूराजा सोनतळीवरुन निघताना वाटेत भेटणारे प्रत्येक नागरिकाला खुशाली विचारत. या खडखड्यामध्ये आपल्या बरोबर इतर नागरिकांना बसवून फिरवत. कोणत्याही जातीधर्माचे इथे वावडे नव्हते. महाराजांच्या अनेक अव्दितीय कामाचा हा खडखडा साक्षीदार आहे. " राजा आपल्या सुखदुःखाला कायमचा उपलब्ध आहे " ही सार्थ भावना रुजवणेत शाहूराजे यशस्वी ठरले आणि म्हणूनच जगातील सर्वोत्तम राजात गणले गेले. " राजर्षी " ही उपाधी फक्त शाहूराजाच्या पुढे लागते त्याला कारण हेच. ....आजकालचे आमचे राजकारणी कसे वागतात हो ? सरपंच पासुन प्रधानमंत्री पर्यत जरा नजर लावा. एखाद्या आमदाराच्या गाडीमागे आणखी चार गाड्या त्याच्या खूशमस्करी करणाऱ्या भांडांच्या असतात. एखाद्या मंत्र्याचा दौरा असेल तर वाहनांची रांग मोठी असते व खास त्याच्या वाहनाला पुढे जाऊ देण्याकरता इतर सामान्य लोकांची वाहने बराच वेळ रस्त्यावर अडवली जातात. मंत्र्याचा तो " ताफा " असतो. अशामुळे म्हणे यांची " प्रेस्टीज " वाढते. खरेतर याच कारणाने या लोकप्रतिनिधी व सामान्य जनते मध्ये अंतर पडत जाते,हे सत्य त्यांना समजेल तो सुदिन...*
लोकांच्यात जो मिसळतो व वावरतो तो लोकप्रतिनीधी नेहमीच स्मरणात राहतो. कितीही वर्षे तुम्ही आमदार अथवा मंत्री असा , जोपर्यंत तुमच्या वाहनाच्या काचा खाली होत नाहीत व तुम्ही सामान्य लोकांना किमान दृष्टीला पडत नाहीत तोवर ही लोक " जनप्रतिनिधी " नसतात हेच खरं. शाहूचरित्र ....हे आपणांस दाखवून देते.
*!! संपर्क ठेवा जनतेशी...तरच असाल " जनप्रतिनिधी " !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५

*शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ४ )*
संकट व माणूस यांचा संबंध फारच जवळचा आहे. संकट मग ते निसर्ग निर्मीत असते अथवा मानव निर्मीत . यामध्ये उध्वस्त होत असते ती सामान्य जनता. संकटकाळी लोकांच्या आधाराला धावून जाणे हे लोकोत्तर राज्यकर्तेचे खरे लक्षण असते. संकटाला देखील भारतीय जीवनात आर्थिक धार्मिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक छटा असतात व त्या कधीकधी फारच ठळक असतात. संकटात सापडलेल्या माणसांना पुन्हा नव्या दमाने उभे करणे हे समाजाचा मुख्य घटक व जबाबदार सेवक म्हणून राज्यकर्त्या लोकांची जबाबदारी असते. ही जबाबदारी माझ्या शाहूराजाने चोख बजावली होती म्हणून तर हा लोकोत्तर राजा आज समाजाच्या आदर्शस्थानी आहे. घटना प्रसिध्द आहे पण त्या घटनेकडे जरा वेगळ्या दृष्टीने पाहिले तर काय दिसते अथवा सापडते ?? पाहूया....
*गंगाराम कांबळे ...हे नाव महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणेच्या महत्त्वाच्या कालखंडातील ठळकपणे उठून दिसणारे नाव. पाणी भरायला गेलेल्या गंगाराम नावाच्या इसमाला मारहाण झाली. ही गोष्ट शाहूंना समजताच त्यांनी आपला " खरा बाणा " तिथे कृतीशील केला. महत्त्वाचे हे की , या घटनेनंतर गंगाराम कांबळेना " सत्यसुधारक हाँटेल " काढून दिले. तिथे स्वतः चहा पिण्यासाठी जाण्याचा धाडशी प्रयोग यशस्वी केला. आपल्या बरोबर असणाऱ्या सर्वजातीयधर्मीय लोकांना जाणीवपूर्वक गंगारामच्या हातचा चहा पाजला. अवमानीत झालेल्या गंगारामना पुन्हा सन्मानपूर्वक समाजात स्थापीत करण्याची शाहूराजाची कला व कौशल्य कोटी वेळा प्रणाम करण्यासारखे आहे. ,...या घटनेतून नेमके काय कळते ? मला असे वाटते की , शाहूराजाने सामाजिक व धार्मिक अंगाने आलेल्या संकटात पिळून गेलेल्या गंगाराम कांबळे नावाच्या एका माणसाचे जाणीवपूर्वक व सन्मानपूर्वक केलेले पुनर्वसन. घटना घडत असतात. प्रशासन आपल्या परीने त्या हाताळत असतात. पण हाताळणारे हात जर हृदयाशी नाते सांगत नसतील तर " सहकार्य म्हणजे देखावा " ठरतो. आपल्या आजूबाजूला बघा जरा....पुनर्वसन करा अशी आरोळी वर्षानुवर्षे ठोकणारे धरणग्रस्त बांधव , भुकंपासारख्या नैसर्गिक संकटात सापडून सर्वस्व गमावलेले किल्लारीसारखे प्रांत अथवा अगदी पूरग्रस्त समाज , भोपाळ वायूकांडातील होरपळलेला समाज...एक ना अनेक उदाहरणे दाखवता येतात. आमचे राज्यकर्ते " हाताने " मदत केल्याचा देखावा करतात पण ती मदत " हृदयापासून " नसल्याने वर्षानुवर्षे पुनर्वसन होत नाही. माणूस व माणसांची वस्ती उध्वस्त होत जाते आणि इकडे राज्यकर्ते हृदयाला कुलूप घालून बसल्याने त्यांच्या अंतरंगात " मायेची ऊब " निर्माण होतच नाही. धरणग्रस्त , पूरग्रस्त अथवा भूकंपग्रस्त , विषारी वायूग्रस्त यांचे हाल संपत नाहीत कारण ....कारण त्यांच्यावर प्रशासनाव्दारे " मायेची पारख " करणारा एक शाहूराजा नसतो.*
लोक अथवा लोकवस्ती , कोणत्याही कारणाने का असेना , पण उध्वस्त होत असताना शासन करणारे राज्यकर्ते जर हृदयाने मदत करत नसतील तर " तेच सर्वात मोठे संकट " असते. हक्काने घ्यायची गोष्ट हतबलतेने अथवा याचकरुपाने घेणे यात सन्मान रुजत नसतो. शाहूराजानी गंगाराम कांबळे यांना हाँटेलकरता आर्थिक मदत देऊन थांबले नाहीत तर त्यांचा सामाजिक सन्मान परत मिळावा व त्यांचे पुनर्वसन व्हावे या उद्देशाने स्वतः हाँटेलात जाऊन चहा पिण्याचा रिवाज पाडला. आमचे राज्यकर्ते कधीतरी धरणग्रस्त , पूरग्रस्त , वायूग्रस्तांकडे स्वतः जाऊन त्यांच्या योग्य पुनर्वसनासाठी झटणार का ?? माझ्या समोर प्रश्न आहे. " माणूस सन्मानाने उभा करा " हेच तर शाहूचरित्र सांगत असते...
*!! पुनर्वसन....हेच असते , संकटग्रस्तांना मुख्य आधार !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५

*शाहूचरित्र ...काय शिकवते ? ( भाग ५ )*
कोणताही राज्यकर्ता अथवा आजकालचे सरकार हे जो खर्च करत असतै तो खर्च लोकांच्या कर रुपातून खजिन्यात जमा होत असतो. या खजिन्यातूनच राज्यकर्ते आपला खर्च चालवत असल्याने या खजिन्याप्रती त्यांच्या भावना कोणत्या प्रकारच्या आहेत यावर त्या राज्याचे व राज्यातील जनतेचे भविष्य दडलेले असते. राजा म्हटल की चैन व विलास यांची गोळाबेरीज होऊन निर्माण झालेले प्रतिक असा समज आहे व अपवाद वगळता तो सत्य आहे. ह्या कररुपी जनतेच्या पैशाचा वापर अत्यंत योग्यरित्या करणे हे राज्यकर्ते म्हणून फारच महत्त्वाचे असते. याबाबतीत शाहूराजाचे धोरण कसे होते ते पाहूया...
*पन्हाळा लाँज....हे मुंबई येथील शाहूराजाचे निवासस्थान . महाराज जेव्हा मुंबईला जात तेव्हा ते इथेच राहत. या ठिकाणाहून फोर्टला जाणे सोईस्कर होते. त्या काळात महाराज वाहन म्हणून व्हिक्टोरिया ( एका घोड्याची गाडी ) वापरत. भाडे देऊन प्रवास करत असत. एकदा महाराजांना फोर्टला जायचे होते. त्यांनी व्हिक्टैरीया बोलवली. गाडीमालकाने भाडे म्हणून दोन रुपये सांगितले. महाराज मात्र एक रुपया देईन असे म्हणू लागले. चांगले पंधरा वीस मिनिट ही हुज्जत अर्थात ठरवाठरवी चालली होती. शेवटी सव्वारुपयाचा सौदा ठरला आणि महाराज गाडीत बसले. काम करून परतलेवर महाराजांच्या साथीदारानी विचारले की महाराज , एक रुपया वाचवण्यासाठी एवढे कशाला धरून बसलात ". तेव्हा शाहूराजे बोलले " अरे , काटकसर केली नाही तर माझ्या राज्याच्या खजिन्याचे दिवाळे निघेल." ....ही गोष्ट ऐकल्यावर आपणांस काय जाणवते ?? शाहूराजे हे खजिन्याचे मालक म्हणून नव्हे तर विश्वस्त म्हणून व्यवहार करत होते. काटकसर अंगी बाणवून योग्य खर्च करणे हे शहाण्या माणसाचे सर्वोच्च लक्षण आहे. याउलट ....याउलट आमचे आजचे राज्यकर्ते कसे वागतात ?? राज्यकर्ते वर्गाचा आजचा डामडौल पाहिला तर खरेच आपण स्वतंत्र भारतात राहतो का असा प्रश्न पडावा असा थाट आहे. गोरे साहेब गेले आणि उरावर हे काळे साहेब अक्षरशः गोरे साहेबाशी मिळतेजुळते वर्तन करु लागले. ज्या करदात्यांचा पैशातून ह्यांचा खर्च चालतो त्यांच्याप्रती हे राज्यकर्ते कृतज्ञ असायला हवेत पण तसे दृश्य दिसत नाही. उलट जनताच यांना सेवकाचे साहेब करुन टाकते आणि मग यांचा साहेबी थाट सुरु होतो. आज आपल्या देशावर असणाऱ्या कर्जाचा मोठा हिस्सा अशाच " साहेबी उधवपट्टीने " आपल्या माथ्यावर बसून राहिलाय. काटकसर या शब्दाला पूर्ण दांडी मारून " कसलीच कसर " सध्याचे राज्यकर्ते आपल्या छानछौकीकरता राखत नाहीत हेच आजचे वास्तव आहे.*
आवश्यक व योग्य ठिकाणी कितीही खर्च होवो , पर्वा नाही. पण वैयक्तिक मानमरातबासाठी खजिना मुक्तहस्ते लाटणे हा अपराधच आहे. अशाने देशाचे लौकरच वाटोळे होईल हा शाहूसंदेश आमच्या राज्यकर्त्यांच्या डोक्यात जलदीने शिरो ..इतकीच अपेक्षा.
*!! मालक म्हणून नव्हे , तर विश्वस्त बनून आर्थिक व्यवहार व्हावा...काटकसरीने !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५

*शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ६ )*
" जसा राजा , तशी प्रजा " अशी म्हण आपल्या समाजात रुढ आहे. या म्हणीचा इतकाच अर्थ आपण घ्यायचा की नेतृत्व जशी मुल्ये अंगिकारते तशी मुल्य समाजात बहुतांशी रुढ होत असतात. म्हणून नेतृत्व हे दुरदृष्टी असणारे , विज्ञानवादी , सारासार विचार करणारे व आधुनिक मुल्ये अंगिकारणाने असले तर तो समाजही दोन पावले पुढे जात असतो. भारतीय समाजात असे विकसनशील व आधुनिक दृष्टी बाळगणारे नेतृत्व आपवादाने आढळते. या अपवादात राजर्षी शाहूजी राजे हे ठळकपणे उठून दिसतात. त्यांची एक प्रसिद्ध अशी गोष्ट पाहूया....
*शाहूराजे...हे अंधश्रध्दा बाळगणारे खचितच नव्हते. त्यांची दृष्टी नेहमीच मागास मुल्यांना नाकारणारी व प्रगत मुल्ये स्विकारणारी होती. एकदा त्यांच्या राजवाड्यात एक ज्योतिषी आला. त्याने शिपायाकरवी वर्दी दिली की " मी राजेसाहेबांचे भविष्य सांगण्यास आलोय ". शिपायाने हा निरोप दरबारात बसलेल्या शाहूराजांना सांगितला. तात्काळ शाहूंनी त्या ज्योतिषाला अटक करून चार दिवस तुरुंगात ठेवण्याची आज्ञा केली. चार दिवसांनी त्या ज्योतिषीला दराबारात बोलवले तेव्हा तो ज्योतिषी महाराजांना गयावया करत विचारु लागला की " महाराज , मी काय गुन्हा केला की तुम्ही मला तुरुंगाची हवा खायला लावली ?". महाराज हसले आणि म्हणाले " अरे , तू माझ भविष्य सांगायला आला होतास ना , मग मला सांग तू इथ आल्यावर मी तुला तुरुंगात डांबणार आहे हे तुझे भविष्य तुला कसे कळले नाही ??" . ज्योतिषी मान खाली घालून उभा राहिला. शाहूराजांनी यातून कोणता धडा घालून दिला ?? माझ्या मते , ज्योतिषी सारख्या ऐतखाऊना कसे उघडे पाडायचे व त्यांना निरुत्तर करण्याचे उदाहरणच शाहूराजाने घालून दिले. ज्याचे मनं , मेंदू व मनगट खंबीर असते त्या कोणाही व्यक्तीला ज्योतिषी हा भ्रामक आधार लागत नाही. याउलट आमच्या आजकालच्या नेतृत्वकडे पाहिल्यावर काय दिसते हो ?? लोकप्रतिनिधी म्हणवणारे आमचे राज्यकर्ते हे निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना शुभवेळ व शुभमुहुर्त पाहण्यासाठी ज्योतिषी नावाच्या भ्रामकावर विसंबून असतात. निवडून आल्यावर आपल्या कार्यालयात केव्हा प्रवेश करायचा त्याचाही मुहुर्त शोधला जातो. कार्यालयात कोणत्या दिशेला आपण,बसावे याचा सल्ला ज्योतिषीला विचारला जातो. एकुण काय तर आमचे राज्यकर्ते हे ज्योतिषी नावाच्या खुंटाला कायमचे बांधलेले असतात. आता सांगा , नेतृत्वच जर इतके कमजोर व आत्मविश्वास नसणारे असेल तर मग समाजात चैतन्य कुठून येणार ? नवनिर्मिती कशी सुचणार ? आमचे राज्यकर्ते आपल्या जनतेला आदर्श घालून देण्यात बिनकामाचे ठरले आहेत एवढं नक्की. तो शाहूराजा हौता म्हणून भ्रामक गोष्टी सांगणाऱ्या ज्योतिषीला तुरुंगाची हवा खायला लागली ...आजकालचे आमचे राज्यकर्ते हे ज्योतिषीला पंख्याची हवा घालण्यात धन्यता मानतील अशी परिस्थिती आहे. शाहूराजा व आजकालचे राज्यकर्ते यांच्यातील हा एक महत्त्वाचा फरक आहे.*
वस्तुतः कोणत्याही विषयासंबंधी विचार करण्यासाठी माणसाला बुध्दी मिळाली आहे. ती बुध्दी योग्य व विधायक कामाकरता वापरण्यासाठी आधी पहिल्यांदा वर्षानुवर्षे साठलेला " मागास विचारांचा कचरा " प्रयत्नपूर्वक काढायचा असतो. ती जागा रिकामी झाली तरच नवा विचार तिथे रुजवाता येतो. शाहूचरित्र ...दुसरे काय नवे सांगते ?
*!! भ्रामक आधार घेऊन उभे राहता येत नाही ...ही जाणीव असूदे !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५

*शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ७ )*
भुकेल्या पोटी असणाऱ्या माणसाला तुम्ही धर्म शिकवायला गेलात तर तो धर्म त्याच्या पचनी पडणार नाही ...साधारणपणे अशा आशयाचे वाक्य स्वामी विवेकानंद यांनी काढले होते. आधी पोटोबा मग विठोबा हे अगदी खरं आहे. शिक्षण हे तरी या आशयापासून कस लांब राहील ? शिक्षण घेणाऱ्या मुलाचे पोट भरले असेल तरच त्याचे लक्ष शिक्षणात लागेल अन्यथा पोटाची भूक त्याला कासावीस करून टाकेल. मानवी जीवनाचे हे सत्य आपणांस बरेच जणांना ठाऊक असते परंतु त्या दिशेने काही ठोस पावले उचलली जात नाहीत हे दुःखकारक आहे. साधारणपणे शंभर वर्षापूर्वी शाहूराजांनी हे सत्य आकलन केलेच व त्यावर विधायक कृती केली. चला , त्यासंबंधी जाणून घेऊ या....
*शालेय पोषण आहार....हा अगदी अलिकडच्या काळातील लोकांना माहिती झालेला प्रकार आहे. शाळेत जाणाऱ्या मुलामुलीना दुपारच्या वेळेत पोटभर अन्न देणारी ही व्यवस्था अत्यंत योग्य आहे. शाहूराजे हे काळाच्या पुढचा विचार करणारा माणूस. कृष्णाजी मोरे ( माजी खासदार ) यांनी शाहूराजासंबधी ही गोष्ट नोंद केलीय. मूळचे मांग समाजाचे कृष्णाजी हे सोनतळी कँपवर शाहूराजांना भेटून " मला शिकायच आहे " अस बोलले. महाराजांनी लगेचच त्या लहान कृष्णाला गाडीत घेतले. गाडी कँपचे कोपऱ्यावर आली असताना मुदपाकघर अर्थात स्वयंपाकघर अथवा खानावळीजवळ थांबली. महाराज आत जाऊन सारी व्यवस्था बघून आले. चार पाच खानसामे जमा झाले. बाहेर पडताना महाराज दरडावले " लक्षात ठेवा , शिक्षण घेणारे एक देखील मुलगा उपाशी राहिला तर तुमची चामडी लोळवीन ". कृष्णाजी आपल्या आठवणीत नोंदवतात कि त्या मुदपाकखान्यातून संस्थानात शिक्षण घेणाऱ्या गरीब मुलामुलीना सकाळी व रात्री दोन भाकरी / भाजी मोफत मिळत असे. या नोंदीतुन " खरं सत्य " काय दिसून येते ?? मला असे वाटते की , मुलांच्या पोटाचा प्रश्न मिटवणे हे आपले आद्य कर्तव्य महाराजांनी मानले. पहिल्यांदा जगता आल पाहिजे आणि मग आणखी योग्य जगण्याकरता शिक्षण हाताशी हवे हा खरी मानवता जागवणारा गाभा शाहूराजा कृतीत आणत होता. शालेय पोषण आहार हा प्रकार एकविसाव्या शतकात आपणांस कळाला तो विसाव्या शतकात शाहूराजा आचरत होता. आपण काय शिकावे यातून ?? शालेय पोषण आहाराशी संबंधित लोकांनी शाहूराजाचे धोरण घ्यावे. मुदपाकखान्यात जाऊन व्यवस्था पाहणारा शाहूराजा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपला व्यवहार तसा करावा. सरकारने पोषण आहार संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना शाहूराजासारखे दरडवायाला हवे. जो मांगाचा पोरगा शाहूराजाकडे शिक्षण मागायला पुढे आला तोच मुलगा शिक्षण घेऊन पुढे खासदार झाला. आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांनी या नोंदी नोंदवून ठेवल्या.*
शाहूराजाची धोरणे आजही प्रस्तुत आहेत. फक्त ती अवलंबताना हृदय शाहूराजाचे हवे. इच्छाशक्ती असायला हवी. भुकेचि गरज जाणून घेऊन मग विद्यामृत पाजणारा हा राजा म्हणून तर प्रत्येकाच्या काळजात अभेद्य घर करून राहीला. माणसाच पोट शांत करा आणि मग त्याला जे पाजयचय ते अमृत पाजा...शाहूचरित्र हे दाखवून देते.
*!! भुकेल्याचे पोट भरून करावा...खरा सदाचार !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५

*शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ८ )*
नाटक - सिनेमा ही माध्यम समाजमनावर बराच परिणाम गाजवत असतात हे वास्तव आहे. यामध्ये चांगला प्रभाव कमी व वाईट जास्त असा प्रकार असतो. या नाटक व सिनेमा माध्यमातून जेव्हा ऐतिहासिक पात्र उभे केले जाते तेव्हा बरेच वादविवाद होत असतात. कलाकृती करणारा आपले हितसंबंध जपत असतो व हे करताना बरेचदा इतरांवर अन्याय करत असतो. कलेच्या माध्यमातून आपले हितसंबंध जपताना " कलाकृती ही कलाकृती म्हणून पहावी , इतिहास म्हणून नव्हे " असा इशारा ही मंडळी देतात खरे परंतु समाजमन मात्र तो इशारा ध्यानात घेत नाही. इतिहास समजून घेण्यासाठी अस्सल कागदपत्रे पाहून लिहिलेला तटस्थ इतिहास वाचण्याचे कष्ट घेण्याऐवजी नाटक सिनेमात सांगातलेले सगळं खरं मानण्याची प्रवृत्ती फारच मोठी आहे. म्हणून या माध्यमावर विशेष नजर असावी लागते. शाहूराजांची अशी नजर सांगणारी एक गोष्ट सांगतो.
*शेक्सपियर...हा जगातील सर्वोत्तम नाटककार. हँम्लेट हे नाटक त्याचे सर्वोच्च नाटक समजले जाते. रंगभूमीवर काम करणाऱ्या प्रत्येक नटाला हँम्लेट आयुष्यात एकदा तरी करावा अशी ओढ असते. शाहूराजांनी राज्याभिषेकप्रसंगी काही नाटके पाहिली. गणपतराव जोशी यांचा हँम्लेट नाटकाचा खेळ शाहूराजानी दोन वेळा पाहिला. हँम्लेटची भुमिका गणपतराव "लांब शेंडी" राखून करत. एके दिवशी काय कळ फिरली अन् कुठून फिरली...कंपनीच्या ठिकाणी गणपतराव न्हाव्यापुढे बसले असता पाठमोरे होऊन वासुदेवराव केळकर यांनी त्यांची शेंडी कापून टाकली. गणपतराव शेंडी कापलेची तक्रार घेऊन महाराजाकडे गेले. महाराज म्हणाले " आरं गण्या , आरं त्यो हँम्लेट काय बामणाच्या पोटचा हुता काय ? त्यावेळेपासून रंगमंचावर हँम्लेट बोडक्याने अर्थात बिनशेंडीचा दिसू लागला. नीट आकलन केले तर यात काय मर्म हाती लागते ?? ऐतिहासिक म्हणणारे नाटकातून आपल्याला आवश्यक हितसंबंध राखणारा एक मोठा वर्ग असतो. चरीत्रनायकाची तोडफोड करून आपणांस हवा तो इतिहास आपल्या या माध्यमातून मांडणारी स्वार्थी माणसं आपणांस ठाऊक आहेत. अलिकडेच म्हणजे साधारणपणे साठ वर्षापूर्वी संभाजीराजे व शिवराय यांच्या चरित्रवर नाटक व सिनेमातून बरेच वादग्रस्त लिखाण झाले. बदनामी झाली. महाराष्ट्र कित्येकदा ढवळून निघालाय. सेन्सॉर म्हणवणारे केंद्र चिकित्सक अभ्यास करत नसल्याने इतिहास बिघडवणारी कलाकृती प्रचाराच्या जोरावर हिट केल्या जातात. सामान्य माणूस तोच इतिहास खरा म्हणून सांगत सुटतै. परिणाम ..चरित्र नायकावर अन्याय होत राहतो व पुढे सत्यनिष्ठ इतिहास संशोधक जेव्हा खरा इतिहास सांगतात तेव्हा समाजात वादविवाद झडतात. सेन्सॉर बौर्डाला शाहूराजासारखी दुरदृष्टी असायला हवी. त्याकरिता इतिहास अभ्यास , समाजमनाचा अभ्यास , इतिहासाशी प्रामाणिकपणा असे गुण असायला हवेत. हे सारे होत म्हणून तर हँम्लेटची शेंडी कापली गेली. महाराज किती गांभीर्याने कलाकृती पाहत असत व चिकीत्सक वृत्तीचे दर्शन यातून दिसते.*
शाहूराजानी जे करून दाखवल ते करणारे हात आज नाहीत. म्हणून तर ऐतिहासिक पात्रांना चारित्र्यहनन बिनदिक्कत केले जाते. लाभ उठवाणारे उठवतात मात्र समाज वादंगाच्या कात्रीत कायमचा अडकतो. तो सापडू नये असे वाटत असेल तर शाहूचरित्र नीट आकलावे लागृल हेच खरं ..
*!! कलाकृतीवर प्रेम करा ....पण चिकीत्सक होऊन !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५

*शाहूचरित्र ...काय सांगते ?? ( भाग ९ )*
" अभ्यासाकरता परदेश दौरा " अशी जाहिरात करून आमचे मंत्री देशविदेशात जात असतात. तिथे जाऊन पर्यटन करणे वा भरपूर खरेदी करणे असाच बरेचदा व्यवहार असतो. हे सारे चालते ते जनतेच्या पैशातून. आजवर अपवाद वगळता मंत्री लोकांनी परदेशातील काही विशिष्ट गोष्ट पाहून आपल्या देशात ती केल्याची उदाहरणे एका हाताच्या बोटावर मोजावी लागतील. अभ्यास दौरा करायला गेलेले हे मंत्री " अभ्यास " करून परतलेवर काही उच्च दर्जाचे त्यांनी केलेले काम दाखवा व हजार रूपये मिळवा अशी जाहिरात वर्तमानपत्रात द्यावी असे मला वाटते . शाहूंच्या जीवनातील ही एक प्रसिद्ध गोष्ट ...
*शाहूराजे...१९०२ साली परदेशात गेले. त्यांनी रोमनगरीस भेट दिली व तेथील आँलिंपिक सामन्याचे स्टेडीयम पाहिले. बरेच दिवस मनात घोळणारा प्रश्न सुटला असे वाटले. कोल्हापूर ही मल्लनगरी. कुस्त्यांची मैदान भरवून आनंद घेणे हा येथील रिवाज. याकरिता तात्पुरते मैदान उभे केले जायचे. प्रचंड जनसमुदाय सामावून घेण्यास ही मैदान आपुरी पडत. महाराजांच्या डोक्यात ही उणीव नाहीशी करण्याचे विचार घोळत असतानाच वरील परदेशवारी घडली. महाराजांनी समोर आँलिःपीक स्टेडीयम पाहिले आणि डोळ्यासमोर कुस्त्याचे मैदान तयार झाले. परदेशावरुन येताच शहराअंतर्गत मोठी जागा पाहून तेथे नवीन मैदान उभारले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जाणीवपूर्वक मैदान उभारले ह्याचे कारण म्हणजे मैदानासाठी लोक फरफटत आणावयाचे नाहीत . कुस्ती शौकीनांस लंगडेतोड करावी लागते व त्या दिवसाचा रोजगारही बुडतो. या गोष्टीचा अभ्यास करून जाणीवपूर्वक शहरातील जवळची जागा निवडली. मैदान उभे राहिले तेच आजचे " जगप्रसिध्द खासबाग मैदान ". ....महाराजांप्रती इतके अप्रुप जनतेला का वाटते त्याचे हे एक उदाहरण. जरा , विचार करा...परदेशात जाऊन पर्यटन करून ऐशआरामात जीवन घालवता आले असते ना. पण परदेशातही गेल्यावर डोक्यात आपल्या सामान्य रयतेच्या छंदाची काळजी वाहणारा माझा शाहूराजा. डोळ्यांत मैदानाचे चित्र तयार होताच आडवळणाला मैदानाकरता जागा देण्याऐवजी केवळ जनतेच्या हिताकरता मध्यवर्ती जागा निवडली. यामागे जनतेचा एक दिवसाचा रोजगार बुडू नये ही सत्प्रवृत्ती भावना. याहीपुढे जाऊन महाराजांनी नुसत मैदान उभारले असे नव्हे तर...मोफत कुस्ती पध्दती बदलून तिकीट लावून मैदान ही प्रथा चालू केली. मैदानाच्या प्रारंभापासूनच कुस्तीगीराकरता "हजारी फंडाची " स्थापना केली. गरजवंत मल्लाला तिकीट विक्रीच्या भागातून खुराकासाठी रक्कम या माध्यमातून दिली जाई. विजयी मल्लास रोख रकमेत इनाम व पराभूत मल्लाना बिदागी दिली जाऊ लागली. कुस्ती क्षेत्रांत ठेकेदारीची प्रथा सुरू करून मल्लविद्येचा विकास केला. केवढी मोठी दूरदृष्टी ही....आजकालचे मंत्री असे काही काम केल्याचे आपण ऐकलेय का ??*
जनता व राज्यकर्ते यांचे नाते हे असे आंतरिक मनाचे असावे लागते. जनतेच्या छंदासाठी परदेशी गेल्यावरही विचार डोक्यात ठेवणारा शाहूराजा जिथे असेल तिथे मल्लविद्येचा प्रसार का नाही होणार ?? सगळं शक्य आहे....फक्त राज्यकर्त्याच्या काळजात एक अंश माझ्या शाहूराजाचा असायला हवा...बस्स
*!! छंदातून विकास...हे सूत्र शिकवते शाहूचरित्र !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५

*शाहूचरित्र ...काय सांगते ( भाग १० )*
राजा प्रजाहितदक्ष असेल तर..प्रजा नेहमीच त्याची आठवण करते. भारतीय इतिहासात अनेक राजे महाराजे होऊन गेले परंतु हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच राजे प्रजेच्या हिताची काळजी वाहत होते. प्रजेला याची जाणीव होती. म्हणून तर चारहजार वर्षे ओलांडली तरी " इडा पीडा टळौ , बळीराजाचे राज्य येवो " अशी आळवणी केली जाते ती बळीराजाची आठवण म्हणून. सम्राट अशोकाचा कालखंड सर्वात संपन्न व वैभवशाली कालखंड गणला जातो आणि चारशे वर्षे होत आली तरी " राजे , परत या " अशी हाक फक्त रयतेचा राजा शिवछत्रपतीना दिली जाते. अगदी याचप्रमाणे कोल्हापूरच्या शाहूराजाची आठवण जपली जाते. या राजाच्या हयातीतच अशा गोष्टी दिसून आल्या. त्यापैकीच एक ....
*सर्वसामान्य रयत तसेच बुध्दीवंत यामध्ये शाहूराजे लोकप्रिय होतेच. याचबरोबर जंगलात राहणाऱ्या सामान्य आदिवासी समाजातही महाराज अत्यंत प्रिय होते. एकदा महाराज शिकारीला गेले असता महाराजांच्या जंगलातील परतीच्या वाटेवर हे आदिवासी बांधव जमले होते. हातात प्रत्येकाच्या दह्याचे लोटके होते . ह्या लोटक्यातील दही शाहूराजाला द्यावे अशी त्या सामान्य जणांची इच्छा होती. वेळ जाता जाता त्यांच्या मध्ये महाराज कोणाच्या लोटक्यातील दही खातात यावर पैज ठरली. महाराज दिसताच सगळे पुढे झाले आणि महाराजांपुढे भरलेल्या दह्याचे लोटके धरले. महाराज चाणाक्ष होते तसेच या सामान्य रयतेचे हृदय जाणणारे होते . लोटक्यातील दह्यावर धुरळा पडू नये म्हणून आदिवासीनी लंगोटीच्या पुढचा धडपा लोटक्यावर झाकला होता. महाराजांनी युक्ती केली. एक मोठा पेला मागवला. एकाच्या लोटक्यावर द्रोण झाकला होता. त्या द्रोणाचे पानं काढून प्रत्येकाच्या लोटक्यात बुडवून दह्याची एकेक कवडी पेल्यात जमा केली. आणि मग समाधानाने जमलेले सर्व दही पिऊन टाकले. सारे आदिवासी आनंदले. आपल्या राजावर इतके प्रेम करणारी जनता व त्या जनतेच्या प्रेमाचा इतक्या सुंदररित्या जपणूक करणारा राजा हे आगळवेगळ समीकरण शाहूचरित्रत आहे.....आजकालच्या आपल्या जीवनातील राज्यकर्ते वर्गातील कुणा एकालाही असा जनतेच्या प्रेमाचा अस्सल अनुभव येईल का ?? विचार करा.*
इतिहासात राजे अनेक होऊन गेले. लोकशाहीत लोकप्रतिनिधी म्हणून निवडले गेलेली राजकारणी एकेकजण संस्थानिकच,आहे जणू. पण जनता मात्र यांच्यावर प्रेम करते का ?? त्याला कारणही तसेच आहे. ज्याला प्रेम हवे असेल त्याने,पहिल्यांदा समोरच्याला प्रेम द्यावे लागते. तरच वाट्याला प्रेम व निष्ठा मिळते. शाहूचरित्र ...हेच तर सांगते.
*!! प्रेम द्यावे , प्रेम घ्यावे ....निर्मळ अनुभव अनुभवावे !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५

*शाहूचरित्र काय सांगते ??.(.भाग ११ )*
कोल्हापूर हे परिवर्तन केंद्र ठरले ते शाहूराजाच्या कृतीशील धोरणांनी. लोकहिताकरता जसे धोरण असावे लागते तसे ती धोरणे प्रत्यक्षात राबवणारी माणसेही प्रशासनात असावी लागतात. शाहूराजानी अशी माणसे संस्थानात मुद्दामहून आणलीत तसेच जी कर्तव्यनिष्ठ माणसे आपल्या संस्थानात होतीत त्यांना जिवाभावाच्या मायेने व स्नेहाने कायमचे बांधून ठेवले. शाहूचरित्र वाचताना अशी असंख्य उदाहरणे सापडतील. मला जे उदाहरण येथे सांगायचय ते जरा वेगळे आहे व त्याला एक वेगळा अर्थ आहे.
*डाँ. वा़नलेस ...हे दांपत्य मिरजेजवळ दवाखाना चालवत होते. महारोगी , क्षयरोगी यांच्या करता स्वतंत्र वसाहत निर्माण करुन नवीन डाँक्टर निर्माण करण्यासाठी मेडीकल स्कूलसुध्दा स्थापन केले. यामध्ये प्रवेश फक्त हिंदी विद्यार्थ्यांनाच द्यावा कारण कधीतरी हिंदूस्थान स्वतंत्र होईल तेव्हा परकीय लोकांच्या आयातीतून आरोग्याची हाताळणी करणेपेक्ष एतद्देशीयच जास्त उपयोग होईल असे वाँनलेस यांचे स्पष्ट मत होते. केवढा दुरदृष्टीचा माणूस... झालं काय की वाँनलेस यांची पत्नी काँलरा होऊन मृत्यू पडली. आपण एवढे निष्णत डाँक्टर असूनही आपल्या पत्नीला वाचवू शकलो नाही अशी खंत वाँनलेस यांना टोचू लागली. ते स्वतःच आजारी पडले. वाँनलेस हे अमेरिकन मिशानशी संबंधित असल्याने मिशनने त्यांच्या मदतीला नर्स म्हणून लिलियन हेवन्स यांना पाठवले. त्या विधवा होत्या व आपले सारे जीवन रोग्यांच्या शुश्रुषेकरता घालवायचे असा निश्चय त्यांनी केला होता. डाँ. वाँनलेस यांच्या बरोबर काम करताना हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. एकमेकांना आधार वाटू लागले. दोघेही लग्नाला तयार झाले. परंतु अमेरिकन मिशनचा या लग्नाला विरोध होता. ही बातमी शाहूराजाला समजली. एके दिवशी कोल्हापूर संस्थानचा शृंगारलेला रथ मिरज मिशन हाँस्पीटल येथे उभा राहिला. स्वतः शाहूराजा रथ हाकत होते. महाराजांनी निरोप देऊन वाँनलेस व लिलियन यांना रथात बसवले. रथ थेट पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावाबाहेरील चर्चच्या समोर येऊन उभा राहिला. कोडोली मिशनचे प्रमुख डाँ. ग्रँहँम यांनी महाराजांच्या सूचनेने सगळी तयारी केली होती. लग्न झाले. महाराजांनी नवदांपत्याला आहेर करून कोल्हापूरला नवीन राजवाड्यावर एक दिवस आदरातिथ्य केले. दुसरे दिवशी पुन्हा स्वतःच रथ हाकत नवदांपत्याला मिरजेला घेऊन गेले. ...ही गोष्ट काय दर्शविते ?? माणसाच्या गुणांची नुसती पारख करून चालत नाही तर त्या माणसाच्या मनात डोकावून व त्याच्या भावना ओळखून त्याला मदतीचा हात पुढे करायचा असतो तो योग्य वेळी. राजा असल्याचे कसलाच बडेजाव न बाळगणारा शाहूराजा म्हणून तर स्वतः रथाचा सारथी बनला. एखाद्या बुद्धीवंत माणसाची गुणग्राहकता ओळखून त्याला आपल्या राज्यातील प्रजेच्या हिताकरता कसे प्रेमाच्या व स्नेहाच्या धाग्याने बांधून ठेवावे याचे हे उत्तम उदाहरण आहे.*
आजकालचे,आमचे राज्यकर्ते हा धडा गिरवतील का ?? प्रत्यक्षात अमेरिकन मिशनला आपल्या अंगावर घेणारा शाहूराजा हा एकमेवच असतो. आजकालचे राज्यकर्ते स्वतःच्या हिताला प्रथम जपतत म्हणून तर सामान्य माणूस चांगल्या चांगल्या लोकसेवेपासून वंचित राहतो. बुध्दीवंताना जवळ करून लोकहीत साधा हाच तर शाहूचरित्र संदेश आहे...
*!! प्रेमाने व स्नेहाने ...माणसे लोकहितार्थ " बांधायची " असतात !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५

*शाहूचरित्र ...काय सांगते ?? ( भाग १२ )*
राज्यकर्ते लोक अर्थात लोकप्रतिनिधी म्हणवणारे लोकांच्या वर्तनाकडे सामान्य माणसाचे बारीक लक्ष असते. राज्यकर्ते कसे वागतात , कसे जगतात हे पाहत पाहत त्याचे अनुकरण करणारा मोठा वर्ग समाजात कायमचा असतो. कुणी त्याच्या डौलदारपणाचा कित्ता गिरवू पाहतो तर कुणी त्याच्या दुसऱ्या एखाद्या वर्तणुकीचा. म्हणून या वर्गाची ही फार मोठी जबाबदारी असते की ...स्वतः विधायक व योग्य वर्तन करून लोकांसमोर आदर्श ठेवावा. शाहूचरित्र वाचताना अशा आदर्शाचा डोंगर उभा राहील. त्यापैकी हे एक महत्त्वाचे उदाहरण ...
*शाहूराजा ...जेव्हा परदेशवारी करायला निघाले तेव्हा बरीच उलटसुलट चर्चा सुरु झाली . अनेक लोक अनेक चर्चा करु लागले. अशातच एकदा सोवळं , पंचपात्र , चंदनाचा गंध , यज्ञोपवीत , उपरणे , शेंडी असा पेहराव घालून आशिर्वाद द्यायला भट वर्गलोक आले. महाराज स्पष्ट बोलले " अहो , तुमचा आशिर्वाद घेऊन माझे आजोबा परदेशी गेले होते ना ?? काय झालं त्यांचे ?? मला तुमच्या आशिर्वादाची अजिबात गरज नाही ". भटलोक परतले. शाहूराजा परदेशी प्रवासाला गेले. अनेक तीर्थस्थान व ऐतिहासिक स्थळे पाहत , कुठेही कसलेही धार्मिक विधी न करता शाहूराजे आनंदाने परतले. शहूराजे सुखरूप परतलेले पाहून पुन्हा भटलोक भेटायला आले. " तुम्ही परदेशगमन केल्याने विटाळले आहात , तुम्हाला शुद्ध करून घेणे हा आमचा धर्म आहे " असे बोलले. महाराज ताडकन उत्तरले " असल्या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही " भटलोक परतले....ही गोष्ट काय दाखवते ?? धर्माचे ठेकेदार म्हणून मिरवणारे लोक राज्यकर्ते वर्गाला आपल्या कर्मकांडरुपी शस्त्राची भीती दाखवून आपला वचक ठेवू पाहतात. अंधश्रध्द राज्यकर्ते याला हमखास बळी पडतात. पण शाहूराजा अंधश्रध्द नव्हते. या कर्मकांडानी समाज रसातळाला जातो आणि यामागची सामाजिक व आर्थिक कारणे ठाऊक असणारा शाहूराजा होता. म्हणून तर त्याच्या समोर भटवर्गाची डाळं शिजली नाही.*
आजकालचे आमचे लोकप्रतिनिधी मात्र या भटीस्वार्थाला बळी पडतात. स्वतः अंधश्रध्द असतातच पण आपल्या उदाहरणाने समस्त समाजालाही उलट्या पावलांचा प्रवास शिकवतात. परिणाम म्हणून कर्मकांडाचे स्तोम माजते आणि सच्चे श्रम दुर्लक्क्षीत राहतात. ते होऊ द्यायचे नसेल तर शाहूचरित्र हाताशी धरा. पोकळ कर्मकांडाना अव्हेरा , जुमानू नका हेच तर शाहूचरित्र शिकवते..
*!! करावे साधार वर्तन , ठेवावे आदर्शाचे भान..!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५

*शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग १३ )*
शाहूराजा हा खरंच कोणत्या रसायनाने बनलाहोता कुणास ठाऊक ? खरे तर नुसता जन्म घ्यायचा म्हणून सरदार घराण्यात जन्मले परंतु कोणताही प्रचलित व्यवहार सरंजामी पध्दतीचा त्यांनी राखला नाही. गोरगरीब लोकांच्यात त्यांच्या पैकीच एक होऊन वावरण्यात कोण आनंद वाटायचा शाहूराजाला. आपली प्रजा जशी जगते तसेच आपण जगायला हवे या अत्यंत मानवतावादी विचारापर्यत शाहूराजाची विचारांची व आचाराची झेप होती हे पाहिले की नम्रपणे हात जोडले जातात. राजा म्हणवणारा हा " माणूस " घोड्याच्या पागशाळेत झोपला , महार - मांगाच्या गाठोड्यातील भाकरी हक्काने खाल्ली , गादीऐवजी घोंगाड्यावर डोके टेकून निवांत जगला. एक ना अनेक उदाहरणे देता येतील.
*एक वैशिष्ट्यपूर्ण आठवण ....१९२० साली नागपूर येथील एक परिषद करुन महाराज कोल्हापूरला परतणार होते. बन्ने नावाच्या आपल्या पी. ए. ला महाराज बोलले की " माझेही तिकीट तिसऱ्या वर्गाचे काढा. अहो , म. गांधी सारखे थोर देशभक्त व स्वातंत्र्य चळवळीचे पुढारी तिसऱ्या वर्गाने प्रवास करतात तर मग माझी एवढी बडदास्त कशाला ??" ...विशेष म्हणजे १८९५ साली महाराजांच्या प्रवासासाठी खास रेल्वे बोगी तयार केली गेली होती. त्या बोगीला " सलून " असे नाव होते. रैल्वे प्रवासावेळी बोगी रेल्वेस जोडत. पलंग, गाद्या - गिरद्या , कुशन खुर्ची , सोफा , स्वच्छतागृह अशा अद्ययावत सोयीने युक्त अशी " सलून " होती. पण आश्चर्य म्हणजे महाराज सलूनमध्ये न बसता इतर डब्यात बसत. सलूनमध्ये,शाही परिवारातील स्त्रीया बसत.,....हे उदाहरण आपल्या पुढे कोणता आदर्श उभा करते ?? राजा मग तो कुणीही असो , जोवर तो जनतेत थेटपणै मिसळत नाही , त्यांच्या सारखे जीवन जगत नाही , त्यांच्या संकटाना आपले संकट समजत नाही , सर्वात महत्त्वाचे म्हणजे ' जरी मी राजा असलो तरी तो मान मिळालाय तो य दिनदुबळ्या व गोरगरीब रयतेच्या प्रेमावर आणि विश्वासावर ही भावना जपत नाही तोवर...तोवर तो राजा हा " लोकराजा अथवा रयतेचा राजा " ठरत नाही. लोक अर्थात समाज नेहमीच कृतज्ञ असतात ते अशा जगावेगळ्या राजांच्या बाबतीत. असा जगावेगळा राजा म्हणजे शाहूराजा.*
आमचे राज्यकर्ते यापासून योग्य तै बोध घेतील तो सुदिन. नेहमी आपल्या आलिशान बंगल्यात व पाँश गाडीत फिरून बडेजाव करणारे लाखो लोकप्रतिनिधी आम जनता रोज पाहते. पण त्यांच्या प्रती कोणताही कळवळा अथवा ममत्व जनतेला नसते. कारण मूळात ते कधीच " जनतेचे प्रतिनिधी " नसतात. ते असतात आधुनिक सरंजामदार. अशांना जनतेच्या हृदयात कधीच थारा मिळत नाही ...हेच तर शाहूचरित्र दर्शविते.
*!! जनतेत मिसळून ...जनतेचे आयुष्य जगा...तरच स्थान हृदयात !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५

*शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग १४ )*
शाहू महाराज हे फार चलाख होते. आपल्या संस्थानात चालू असलेल्या हरएक बाबी बाबतीत त्यांचे काळजीपूर्वक लक्ष द्यायचे. असंख्य उदाहरणे दिसून येतात त्यांच्या चरीत्रात. काही गोष्टी म्हटल्या तर अत्यंत मजेदार आहेत. तसेच त्या गोष्टी म्हणजे शाहूराजाच्या बद्दल एक वेगळाच आदर उत्पन्न करणाऱ्या आहेत. काही प्रामाणिक मतभेद उभे करूनही ....हे अस्सच करायला हवं अस आपले एक मन म्हणत असतेच. अशीच एक गोष्ट ...
*लाचखोरी....ही संपूर्ण शासनव्यवस्था बदनाम करत असते. लाचखोरी हा भ्रष्टाचारच असतो. तो करणारा गब्बर व निबर झालेला असतो. अशी माणसे आपण भ्रष्टाचार केलाय हे कधीच कबुल करत नाहीत. परिणाम असा होतो की , जनतेचा पैसा नाहक बरबाद करतो. असाच एक अधिकारी कोल्हापूर संस्थानात " लाचखोर अधिकारी " म्हणून प्रसिद्ध होता. एकदा सकाळी महाराजांनी त्याला राजवाड्यावर बोलावले. थेट दिवाणखान्यात नेऊन त्याला समोरच्या खुर्चीवर बसवले. महाराज बसले होते त्यांच्या हाताजवळ महाराजांनी पाळलेला वाघ बसला होता. महाराज शांतपणे विचारत होते की , तुझ्या लाचखोरीची प्रकरणे माझ्या कानावर आली आहेत. हे खरे आहे का ?? अधिकारी बदमाश होता.तो कबुल होईनाच. महाराजांनी मग एक युक्ती केली. बोलता बोलता महाराज आतल्या खोलीत गेले. दिवाणखान्यात उरला तो अधिकारी आणि महाराजांचा पाळलेला वाघ. अधिकारी थोडा घाबरला. थोड्या वेळानं वाघ जरा जास्त गुरगीरुरायला लागला. अधिकाऱ्यांकडे डोळे वटारुन पाहू लागला. अधिकारी जास्तच घाबरला. थोड्या वेळाने वाघ उठून उभा राहिला आणि मग अधिकाऱ्यांचि गाळणच उडली. महाराज , महाराज अशा बोंबा ठोकू लागला. " महाराज , मी भ्रष्टाचार केलाय हो ...या वाघापासून मला वाचवा " अशा आरोळी ठोकू लागला. महाराज सारा प्रकार पाहत होते. अधिकाऱ्यांच्या कबुलीनंतर महाराज बाहेर आले आणि वाघाला माया करून शांत केले.... शाहूराजाने ही जी युक्ती वापरली त्याला आत्यंतिक मानवतावादी म्हणवणारे कदाचित नाक मुरडतील. पण बहुसंख्य जनता शाहूराजाचा मार्ग योग्य असल्याची ग्वाही देतील अशी मला खात्री आहे.*
सध्याच्या लोकशाही राज्यात कदाचित हे मार्ग वापरत नसतील. त्यावर मला काही बोलायचं नाही. पण लाचखोर अधिकारी हे अत्यंत मुर्दाड व मानवतावादविरोधीच मनुष्य असतो हेच खरं. मध्यंतरी एका हिंदी चित्रपटात खूनाचा साक्षीदार असणाऱ्या व आंधळे असल्याचे ढोंग वठवणारे व्यक्तीला त्याचे ढोंगी आंधळेपण बाहेर काढण्यासाठी नायक त्याच्या पायात अस्सल नाग सोडतो. पायाजवळ नाग येताच " आंधळ्याला दृष्टी " येते. खूनाचा उलगडा होतो. हे मार्ग व्यवहार्य आहेत का यावर गोलगप्पा मारणारे मारोत गप्पा. मला मात्र शाहूराजाची युक्ती योग्य वाटली. खटाशी खट , उध्दटाशी,उध्दट हे मानवतवादी पध्दतीने करता येते..हेच शाहूचरित्र शिकवते.
*!! करावा व्यवहार युक्तीने ..अन साधावा कार्यभाग ...प्रामाणिकपणे !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५

*शाहूचरित्र ...काय शिकवते ??.( भाग १५ )*
राजा..मग तो कुणीही असो , त्याचे राजेपण टिकून असते ते त्याच्या स्वतःच्या पराक्रमबरोबरच त्याच्या राज्यातील कष्टकरी श्रमिकांच्या जोरावर. श्रमिक मग तो साधा कारकुन असो अथवा प्रशासकीय अधिकारी असो...साधा शेतकरी असो वा मंत्रीगण असो . या प्रत्येक कष्टकरी वर्गाच्या श्रमाला जो सन्मान देतो तोच " लोकराजा अथवा रयतेचा राजा " म्हणून गौरविला जातो. कष्टकरी वर्गाचा यथोचीत सन्मान ज्या राज्यात होतो ते राज्य व तो राजा कायमचा स्मृतीत कोरला जातो. शाहूराजा हा असाच थोर राजा..जो आपल्या राज्यातील कष्टकरी वर्गाचा यथोचित सन्मान करत होता. पाहूया ही गोष्ट ...
*शाहूराजा आपल्या खडखड्यातून सोनतळी कँम्पकडे जात होते. सहज लक्ष गेले तर एक वृद्ध स्त्री डोक्यावर शेणी घेऊन विकायला जात होती. भर दुपारची वेळ . तिच्या चेहऱ्यावर असणारे कष्टकरी भाव शाहूराजाने ताडले. खडखडा त्या म्हातारी जवळ नेऊन महाराजांनी दोन रूपये देऊ केले व म्हणाले " दोन रुपये घे आणि डोक्यावरच्या शेणी इथेच टाकून जा " म्हातारीने स्पष्ट नकार दिला. दोन कारणे सांगितली . एक म्हणजे या शेणीची किंमत फक्त बारा आणे होती , दोन रुपये नव्हती. दुसरे असे की , ह्या शेणी रस्त्याकडेला टाकून नुसते पैसे ती घेणार नव्हती. शाहूराजाने " म्हातारीचे मनं " वाचले. तिच्या हातावर बारा आणे ठेवले व सर्व शेणी खडखड्यात ठेवायला बरोबरच्या लोकांना सांगितले. शेणी खडखड्यात बसताच खडखड्यातील लोकांना बसायला गाडीत जागा राहिली नाही. महाराजांनी कसलाही विचार न करता स्वतः पायी चालायला सुरुवात केली. मागोमाग सगळे लोक चालू लागले. नंतर सर्वांनी विनंती करून महाराजांना खडखड्यात बसवले. महाराज जाणाऱ्या त्या म्हातारीकडे एकटक बघत राहिले.....ही गोष्ट काय दर्शविते ?? शाहूराजाचे राज्यातील कष्टकरी वर्ग हा ऐतखाऊ भाड खाणारा नव्हता. आपल्या कष्टाएवढेच पैसे तै घेत होता.आणि महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या कष्टाला प्रमाण मानत होता. म्हातारीने म्हणून तर शेणी रस्त्यावर टाकून जायला नकार दिला. शाहूराजाही किती महान बघा...स्वतःच्या गाडीत त्या कष्टकरी म्हातारीच्या शेणी,भरून स्वतः पायी चालू लागला. ही कृती म्हणजे त्या म्हातारीच्या कष्टाला केलेला सलामच होता. आपल्या जनतेच्या " इमानाला " ओळखणारा असा हा शाहूराजा होता. खडखड्यात पुन्हा बसल्यावर महाराज बरोबरच्या लोकांना स्पष्ट बोलले " एवढं आपल्या मध्ये कुणी इमानी आहे का ? हाताला लागलेले परत करता का कधी ??". शाहूराजा असा जगावेगळा राजा होता.*
अशी कष्टकरी वर्गाची कदर जर आजकालचे राज्यकर्ते करते झाले तर भारत महासत्ता बनायला किती वेळ लागेल हो ? पण हे होणे नाही. कारण ...कारण त्याला काळीज शाहूराजाचे असावे लागते. आपल्या जनतेतील " इमानपणाची खूण " ओळखणारा शाहूराजा म्हणून तर लोकराजा गौरविला गेला. उत्तम राज्यकर्ते व्हायच असेल तर हा गुण असायलाच हवा ...हेच तर शाहूचरित्र शिकवते.
*!! कष्टकरी वर्गाचे ओळखावे इमान...तरच राज्यकर्ते म्हणून व्हाल महान !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५

*शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग १६ )*
राज्यकर्ते वर्गाबद्दल आदरभाव बाळगून वर्तन करावे असा संकेत असला तरीही तसा राज्यकर्तेही असावे लागतात. शिवाजी महाराजांकरता प्रसंगी प्राण देणारे मावळे होते म्हणून तर हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. महात्मा गांधीच्या अंगावर पडणारी प्रत्येक लाठी आपल्या खांद्यावर झेलणारे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते म्हणून तर देश स्वातंत्र्य होऊ शकला. अगदी तसेच शाहूराजालाही अनेक माणसे जिवाभावाची भेटलीत म्हणून तर " पिलर आँफ सोशल डेमाँक्राँसी " असे सार्थ वर्णन शाहूराजाचे झाले. पण लोकहो , हा व्यवहार काही एकतर्फी नसतो. स्वतः शिवराय आपल्या मावळ्याकरता रणांगणावर शत्रू समोर उभे ठाकत होते ...गांधी स्वतः सर्वात पुढे सत्याग्रहात चालत होते..तसाच शाहूराजा आयुष्यभर आपल्या दिनदलीत रयतेच्या काळजीने जगत राहिला. हे " देणे - घेणे " असे दुतर्फा असते.
*किशाबापू खतकर..हा नोकर शाहूराजावर जिवापाड प्रेम करायचा. अशिक्षित असल्याने डोक्यात देव - भूत पिशाच्च ह्या कल्पना ठासून भरलेल्या होत्या. महाराज जरा चिंतेत दिसले की देवाची आळवणी करून इडा पीडा टळो अशी प्रार्थना करायचा. महाराज जरा कमी जेवले की महाराजांच्या नकळत लांबूनच त्यांच्या शरीरावरुन मिरच्या उतरुन दृष्ट काढायचा. डोळ्यांत पाणी भरले काळजीने तर महाराजांनी ध्यानात येऊ नये म्हणून डाव्या हाताच्या बाहीने डोळे पुसायचा. एकदा महाराज शिकारीकरता शेडबाळले गेले. रस्त्यावर मुस्लिम समाजाची माणसे भेटली व महाराजांना म्हणली हुजुर , काळवीटानी धुडगूस घातला आहे. बंदोबस्त करावा. महाराज शिकारीला बाहेर पडले. किशाबापूला लोकांच्या कडून कळले की त्या भागातील एक पट्टाच्या पट्टा दलदलीचा असून तो वरुन जमिनीसारखा भासतो , परंतु त्यावर पाऊल टाकताच माणूस खैल रुतला जाऊन जमिनीत गडप होतो. हे ऐकून किशाबापू घाबरला. महाराजांच्या विषयी काळजी वाटायला लागली. संध्याकाळ झाली तरी महाराजाचा पत्ता नाही हे बघून महाराजांना शोधायला बाहेर पडला. मोटारीच्या कार्बाईटचा दिवा घेऊन शोधाशोध सुरू झाली. थकून भागून परतणारे महाराज त्याला दिसले. तेव्हा किशाबापूला राग आवरला नाही. तो सरळ महाराजांना म्हणाला " कुठल्यातरी आंग्या - सांग्याने सांगताच विश्वास ठेवून शिकारीला जायचृ का ? त्या दलदलीत अडकला असतात तर ? " प्रत्यक्ष महाराजांना किशा बोलतोय हे बघून भोवतीची माणसे घाबरली. परंतु महाराजांनी आपल्या या अशिक्षित पण मायाळू , प्रेमळ नोकराची माया जाणली. ते फक्त हसले. किशाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणले " चल बाबा , चुकलं माझं ".....ही गोष्ट किशाबापू सारख्या सामान्य नोकराचे आपल्या राजावरील प्रेम दर्शवितेच पण त्याबरोबरच शाहूराजाचे " साधं मनं " दर्शवते. एका सामान्य नोकराला अवतीभोवतीचे लोकांसमोर " माझं चुकलं " अस एक छत्रपती म्हणतो हा त्या छत्रपतीच्या मनाचा मोठेपणा आहे. तो नीट समजून घ्यायला हवा.*
असेच एकदा ...साठमारीच्या खेळावेळी एका हत्तीचा दात धडका देताना मोडल्याने हत्ती उन्मत्त झाला. हत्तीचा माहूत अंबादास हा हत्तीला सावरण्याकरता साठमारीचे मैदानात उडी मारून उतरला. हत्ती उन्मत्त आहे तो अंबादासला मारणार हे ध्यानात येताच शाहूराजाने स्वतः त्या माहूताछि जीव वाचवण्यासाठी साठमारी मैदानात उडि घेतली. आपल्या सामान्य नोकरासाठी जो स्वतः मरायला तयार होतो त्या शाहूराजाला जिवाभावाचि लोक मिळणरच. आपल्या नोकरांप्रतीही माणुसकी भावना ठेवून त्यांना माणूस म्हणून वागवा..हेच तर शाहूचरित्र संदेश आहे.
*!! व्यक्ती म्हणून सन्मान करावा...जीव लावावा...तरच " जीव " देणारे भेटतात !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५

*शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग १७ )*
सण - उत्सव यांचे महत्त्व मानवी जीवनात असाधारण आहे. धकाधकीच्या जीवनातील स्पर्धेत सण उत्सव माध्यमातून सामान्य माणसापासून गर्भश्रीमंत माणसापर्यत सर्वजण आनंदनिधान पावत असतात. महत्त्वाचा फरक इतकाच की श्रीमंत वर्ग ऋण न काढता सण करतो आणि गरीबाला ऋणाशिवाय उत्सव करता येत नाही. हे वास्तव पचवूनही सण उत्सवाचे महत्त्व नाकारता येत नाही . सण साजरा करण्याची प्रत्येक वर्गाची एक वेगळी पध्दती असते. विषय शाहूराजाचच चालूय तर महाराजाची एक दिवाळी नजरेखालून घालूया...
*दिवाळी ...सणाचा आनंद काही औरच असतो.पणती व आकाशकंदीला व्दारे प्रकाशाने आकाश उजळून निघते. लाडू चिवडा करंजी अशा तिखटगोड पदार्थाची रेलचेल असते. शाहूराजाही दिवाळी दिवशी राजवाड्यावरील सर्व विधी आटोपून गावात फेरफटका मारायला बाहेर पडले. रथातून खाली उतरणार इतक्यात झाडांच्या मागे लपलेल्या लहान मुलावर नजर पडली. महाराजांनी जवळ बोलवताच तो लहानगा रडू लागला. त्याच्या हातात एक डबा होता. महाराजांनी विचारताच माझ्या बाबाचे जेवण आहे अस तो बोलला. बाबा कुठं आहेत अस विचारताच मुलाने बोट करून पाठिमागील फुटबोर्डावर उभ्या असलेल्या गृहस्थाकडे दखवले. महाराजांनी डबा उघडला तर त्यात दोन भाकरी व जरासा झुणका दिसला. अख्खे शहर गोड पदार्थ खात असताना माझ्या नोकराच्या घरात हे दारिद्रय ? महाराज गलबलले. महाराज सावरले.जासूदाला बोलवून " या पोराला घेऊन जा , आंघोळ घाल " असे फर्मावत उटणे व अत्तर दिले. आंघोळ करून पोरं परतले. महाराजांनी त्या पोराला जवळ घेऊन नवीन कपडे आणले. स्वतःच्या हाताने त्याला चढवू लागले. दूरवरुन त्या पोराचा बाप डोळ्यांत आनंदाश्रु आणून सर्व पाहत होता. नंतर महाराजांनी त्या पोराबरोबर जेवण घेतले आणि सर्व घराला पुरेल इतका फराळ बांधून त्या पोराला आपल्या गाडीतून घरी सोडायला लावले.....ही गोष्ट काय सांगते ?? महाराज नुसते राज्यकर्ते नव्हते तर सच्चा माणुसकीचा पाझर होते. आपल्या रयतेच्या वाट्यालाही आनंदाचे दोन क्षण यावेत अशी त्यांच्या मनाची आस होती . सण प्रत्येकाला असतो पण जे लोक ते साजरा करण्याची " ऐट " करु शकत नाहीत त्यांना आपल्या वाट्याचे दोन घास द्यावेत हीच तर माणुसकी..हीच बंधूता.*
जो राज्यकर्ता आपल्या रयतेप्रती इतका जिव्हाळा हृदयात जपतो त्याला नेमके काय म्हणावे बरं ?? प्रश्न आहे. सामान्य रयत त्यालाच " देव " संबोधिते. बुध्दिजिवी वर्ग त्याला " राजातील माणूस आणि माणसातील राजा " असे विशेषण लावते. शेवटी काय हो...दुसऱ्याचे सुख व दुःख जो आपले मानतो तोच " खरा माणूस " असतो हेच शाहूचरित्र सांगते.
*!! द्यावा गरीबाला एक घास....तिथेच असेल माणुसकीचा वास !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५

*शाहूचरित्र ....काय दर्शवते??( भाग १८ )*
राजा म्हटल की , त्याला व्यसन हे चिकटलेलेच असते. सन्माननीय अपवाद वगळता बहुतेक सर्व राजेशाहीचे यवच्छेदक लक्षण आहे. आमचे बहुतेक सारे राजे दारुच्या व्यसनात आकंठ बुडालेले आपण पाहिलेत. दारुची नशा ..त्यांना जनतेच्या कल्याणाची बातच करु देत नव्हती. पिढ्यानपिढ्या राजा नंतर युवराज अशा क्रमाने दारुने राजेशाहीला विळखा घातलेला होता. शाहूराजा संबंधित ही गोष्ट मला लैलै आवडलीय...पाहूया
*एक दिवस शाहूराजा कसबा बावडा येथील आपल्या वडिलांच्या निवासस्थानी सिस्टर्स पँलेस येथे गेले. आबासाहेबांचा मृत्यू दारुच्या व्यसनाने झाला होता. या कारणाने शाहूराजाला दारुचा अत्यंत तिटकारा होता. दिवाणखान्यातील आबासाहेबांची तसबीर पाहून महाराज क्षणभर थबकले. आणि तसेच आबासाहेबांच्या आधुनिक अशा मद्यपानगृहात शिरले. आत जातात न् जातात तोच " फाड फाड " असा जोरदार आवाज येऊ लागला. काय चालले आहे हे बघण्यासाठी सारे आत शिरले तर मद्यपानगृहातील सर्व दारुच्या बाटल्याआचा चक्काचुर झाला होता. महाराज स्पष्ट बोलले " आमच्या आबासाहेबांच्या पोलादी शरीराची राखरांगोळी करणारी , आम्हाला व आमच्या बापूसाहेबांना पोरके करणारी ही दारु आमच्या आबासाहेबाच्या निवासस्थानी हवीच कशाला ??.....ही गोष्ट काय सांगते ?...पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी ही महाराजांची कृती आहे. आबासाहेबाचे पोलादी शरीर दारुने नासवले ह्या रागाला अत्यंत विधायक वळण सर्व दारुच्या बाटल्या फोडून महाराजांनी दिले असे मला वाटते. जे आपल्याला नासवते त्याला घरात ठेवायचेच कशाला ? हा यथार्थ विचार यामागे होता. शाहूराजा आयुष्यभर दारुपासून दूर राहिला. अगदी डाँक्टरनी दिलेली औषधातून दारुही ( ब्रँन्डी ) महाराजांनी घ्यायला नकार दिला अशी गोष्ट आहे.एकदा हा प्याला तोंडाला लागला की तो खाली ठेवता येत नाही ..म्हणून तो तोंडाला लावूच नये अशी ही प्रतिबंधक योजना आहे.*
आजकालचे राज्यकर्ते धान्यापासून दारु बनवण्याची योजना आखतात..महसूल मिळावा म्हणून विक्रीसाठी मंजूर करतात. परवाने देऊन भावी पिढी नासवतात. शाहूराजा व आजकालचे राज्यकर्ते यांच्यात हा फरक आहेच आहे. व्यसनापासून दूर राहिले तरच जनतेच्या हिताचा व्यवहार करता येतो..हेच शाहूचरित्र सांगते.
*!! व्यसनाला द्या नकार...जनहिताला द्या कृतीशील आकार !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५


No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...